HomeBlogमुंबई मराठी पत्रकार संघ एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन

मुंबई मराठी पत्रकार संघ एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत पत्रकारितेतील तंत्रज्ञान, विश्वासार्हता आणि कौशल्यवृद्धी यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे

मुंबई, दि. 14 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषद 2026 मध्ये मंचावर उपस्थित मान्यवर
मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित ‘एआय परिषद २०२६’मध्ये मंचावर मान्यवरांची उपस्थिती.

एआय परिषद २०२६ चे उद्घाटन

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एआयमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होणारे बदल, संधी आणि आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.

छपाई तंत्रज्ञानापासून डिजिटल माध्यमांपर्यंतचा प्रवास

श्री. सिंह म्हणाले, मानव इतिहासात ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलली. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होते; मात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता; डिजिटल माध्यमे आली तेव्हा टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेल, मात्र जे काही काम स्वयंचलित होऊ शकते ते एआयमुळे स्वयंचलित होणार हेही वास्तव आहे, असे त्यांनी नमूद केले.

पत्रकारितेत वाढणारा एआयचा वापर

आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत आहे. जगात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी अनेक क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेतील कामकाजाची पद्धत बदलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

“पत्रकारांची नोकरी एआय घेणार नाही; मात्र एआय वापरणारा दुसरा व्यक्ती तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.”
— ब्रिजेश सिंह

एआय कौशल्यांचे महत्त्व

तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांना एआयचे प्रशिक्षण देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

पत्रकारितेतील सत्यता आणि विश्वासाचे महत्त्व

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे ज्ञान निर्मिती, प्रसार आणि वापराची संपूर्ण पद्धत झपाट्याने बदलत आहे. पत्रकारितेतील अनेक कामे ही स्वयंचलित होत आहेत. भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित (ऑटोमेटेड) होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याची जबाबदारी मात्र मानवी बुद्धिवरच राहणार आहे. त्यामुळे एआयमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलणार असले, तरी पत्रकारितेचे मूलभूत बळ म्हणजे विश्वास असून सत्यता, विश्वास आणि संपादकीय जबाबदारी ही पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कायम राहणार आहेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बातम्यांचे बदलते स्वरूप

एआयमुळे बातम्या रिअल-टाईम, गतिमान आणि वैयक्तिकृत (हायपर पर्सनलाइज्ड) होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या “अटेन्शन इकॉनॉमी” मध्ये वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जात आहे. काही विदेशी वृत्तसंस्था एकाच बातमीचे अनेक पर्याय तयार करून वेगवेगळ्या वाचकगटांना पाठवतात आणि कोणता प्रकार प्रभावी ठरतो याचा अभ्यास करतात, अशी माहितीही प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी यावेळी दिली.

माहितीच्या वेगात वाढ

एआयच्या मदतीने रिअल-टाइम कंटेंट, इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओ तयार होत आहेत. त्यामुळे बातम्या ‘लिक्विड’ आणि सतत बदलणाऱ्या स्वरूपात उपलब्ध होत आहेत. माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. आज एआयमुळे एक व्यक्ती दिवसाला २०-३० लेख तयार करू शकते. त्यामुळे माहितीचे प्रमाण वाढले असले, तरी त्यातील विश्वासार्हतेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

भारतीय भाषांसाठी एआयची मर्यादा

एआयची एक मोठी मर्यादा म्हणजे भारतीय भाषांचे आकलन. एआय तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली तरी त्याला मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ पूर्णपणे समजत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. बहुतेक मोठी लँग्वेज मॉडेल्स ही विकिपीडिया, रेडिटसारख्या पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्याने भारतीय अनुभव, संस्कृती आणि भाषांचा डेटा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि “डेटा सार्वभौमत्व” महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एआयमधील चुकीच्या माहितीचा धोका

एआयवर आधारित प्रणाली कधी कधी चुकीची माहिती तयार करतात. ‘हॅलुसिनेशन’मुळे नसलेले संदर्भ किंवा माहिती निर्माण होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्येही एआयने चुकीची माहिती दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एआय-निर्मित सामग्रीची जबाबदारी शेवटी संपादकीय स्तरावरच राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषद 2026 मध्ये ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन ऐकत असलेले पत्रकार
मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित एआय परिषद 2026 मध्ये ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन ऐकत असलेले पत्रकार व मान्यवर.

पत्रकारितेचे दोन संभाव्य प्रवाह

श्री. सिंह म्हणाले की, एआयमुळे माहितीचे प्रचंड प्रमाण तयार होत आहे. डिजिटल माध्यमांमध्ये “एआय स्लॉप” म्हणून ओळखली जाणारी मोठ्या प्रमाणातील हलकी सामग्री तयार होत आहे. त्यामुळे भविष्यात पत्रकारिता दोन भागांत विभागली जाऊ शकते, एक म्हणजे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सामान्य बातम्या आणि दुसरी म्हणजे संशोधनाधारित, तपासात्मक व दर्जेदार पत्रकारिता.

डिप फेकचा वाढता धोका

एआयमुळे “डिप फेक” सारख्या तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. खोटे व्हिडिओ तयार करणे सोपे झाले असले तरी खऱ्या व्हिडिओलाही “डिप फेक” म्हणण्याची प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे सत्यावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट चेक प्रणाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. संशयास्पद व्हिडिओ किंवा माहितीची पडताळणी करून ती खरी की खोटी हे तपासण्याची सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर

याशिवाय पश्चिम देशांमध्ये विकसित होत असलेल्या “प्रोव्हेनेन्स” तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, फोटो किंवा व्हिडिओमध्ये विशिष्ट डिजिटल स्वाक्षरी (डीएनए सिग्नेचर) समाविष्ट केली जाते. त्यामुळे मूळ सामग्रीमध्ये कोणताही बदल झाला आहे का हे सहज ओळखता येते. भारतातही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क विभागातील एआयचा वापर

श्री. सिंह यांनी सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात एआयचा वापर सुरू झाला आहे. बैठकींचे मुद्दे किंवा माहिती टाकल्यानंतर त्यातून तत्काळ विविध भाषांमध्ये सामग्री तयार करता येते. त्यामुळे सरकारी माहिती आता रिअल-टाइम स्वरूपात प्रसारित करता येत आहे आणि डिजिटल माध्यमांवरील पोहोच मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पत्रकारांनी तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक

यावेळी श्री. चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून पूर्वी एखादी बातमी करण्यासाठी रिपोर्टर, कॅमेरामन, सहाय्यक आणि चालक अशी अनेकांची टीम लागायची; मात्र आता एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, व्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी सर्व कामे करू शकतो. तंत्रज्ञानाची ही प्रगती थांबवता येणार नाही, त्यामुळे पत्रकारांनी एआय आणि नवीन साधनांशी जुळवून घेणे आवश्यक आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषद 2026 मध्ये उपस्थित पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधी
मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित एआय परिषद 2026 मध्ये पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित.

परिषदेत तंत्रज्ञानावर भर

प्रास्ताविकात श्री. शिर्के यांनी सांगितले की, एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख अनेकांना असली तरी त्याचे सखोल ज्ञान अशा परिषदांमधूनच मिळते. त्यामुळे या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणे पत्रकारांसाठी महत्त्वाचे आहे. राज्यात एआयचा वापर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आग्रही असून शासनाच्या कामकाजातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रधान सचिव श्री. सिंह यांच्या हस्ते परिषदेतील वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.

आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत असून डिजिटल माध्यमांमुळे बातम्यांचे स्वरूप वेगाने बदलत आहे. यासंदर्भात डिजिटल पत्रकारितेतील बदलांविषयी वाचा या लेखात अधिक माहिती दिली आहे.

राज्यात एआयचा वापर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आग्रही असून शासनाच्या कामकाजातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट पाहता येईल.

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular